Wednesday, March 28, 2012

तो-(कवि ग्रेस)

तो

तॊ नेहेमीच जायचा दिशांची चौकट ओलांडून
द्यायचा तिथल्यांना अज्ञात काहीतरी, आणि ते हिरवळून जायचे.

तो बुडवून टाकायचा सुर्याची क्षितीजावरली किरणं
आणि मग शब्दांना घेवून फिरायचा, गुंफायचा ओळींचा गजरा संधीकालात.

तो बांधायचा मृगजळाचे घर, सजवायचा संध्याकाळच्या कवितांनी
आणि मग बसायचा तिथेच, पण आपल्यासाठी तो तिथे नसायचाच.

त्या घरा समोरील सूर्यबिंब आता विझतच नाही...
दिशापल्याडची माणसं करपलीयेत-तरसलीयेत त्याच्यासाठी...
त्याच्या शब्दांचा संधीकाली गजरा आता विखरून पडलाय.....

कुणाच ठाऊक कुठल्या अज्ञाताच्या प्रवासात ज्ञात शोधत फिरतोय तो ह्या सगळ्यांना मागे सोडून...
.........
.........
तो तेव्हाही आपला न्हवताच... आणि आता तो फक्त त्याचाच त्याच्यासाठी...

- ऋतू

Tuesday, March 27, 2012

कवि ग्रेस- भावपूर्ण आदरांजली


सृजनशील सौंदर्यविश्‍वाचा हंबर

सृजनशील सौंदर्यविश्‍वाचा हंबर
निमित्त
किशोर पाठक ग्रेस,
दीप जळतो हे तर धादांत सत्य आहे, त्याला तेलाचा स्नेह लागतो हेही सत्यच आहे; आणि तळहातावर नेकीने वळलेली रुईची वात हा दिव्याचा ज्वलंतमंत्र आहे. पणतीच्या चिमुकल्या भातुकलीत एखादा किडा, एखादे रेशमी पैलूचे उड्डाण पाखरू त्या ज्योतीवर झेपावले की त्याची झेपावण्याची तर्‍हा ती जळती ज्योत इवलीशीही घायाळ न करत, त्याची मोक्षराख भिरकावून देते. आणि मग जळणार्‍या दीपिकेचे सर्व कवी, कलावंत युगानुयुगे, आळवून आळवून मंथन करीत असतात. पण दीपिकेने आपल्या नेत्रकटाक्षाने उडविलेली त्या यक:र्श्‍चित किड्याची चिमूटभर राख जर स्वत:च तडफडता स्वयंभू आकार धारण करून तिच्या प्रकाशाच्या दूरच्या कोपर्‍यात उभी राहून हे मोक्षराखेचे सूत्र गुणगुणू लागली तर. नव्या संहितेचा जन्म होतो.
ग्रेस,
ज्वालांचे धगधगते उज्ज्वल यश धारण केलेली स्वयंप्रज्ञा लौकिक बिंदूंना लाथेने उडवत, कुस्करल्या गेलेल्या कमलपत्रांच्या पाकळीभावनांना अक्षरांचे अवगुंठन देत नव्या सृजनशील शृंगाराचा मुहूर्तसाज उभारणारा एखादाच अक्षरभ्रष्ट योगी असतो. तो पुन:पुन्हा जन्मत नाही शरीराने. परंतु त्याचे मरणही नवनव्या शततारकांच्या उड्डाणसंज्ञांना पालाण घालते. नवनवे घायाळ संघर्षनाते उभारून ते जगणे मृत्यूच्या सं™ोनेच जिवंत ठेवत राहते. अज्ञानाच्या वैराणावर विराट वाळवंट उभारून स्वत: सोबत लक्षावधी शब्ददग्ध वियोगनिष्ठांना पायपीट करायला लावणारा तू एक विश्रब्ध अपरूप अवलिया, संध्यापर्वाची प्रार्थना उगाळून वैराण सूक्ताच्या अधांतरात स्वत:ला नि:संकोच तरंगत ठेवणारा.
ग्रेस,
समजून घ्यायचा नाहीच हा संकल्प ! की उमजून त्याचा लेखनाचा क्रियाकर्मविधी करायला मोकळे झालेले भाषापंडित कृष्णसर्प, त्यांच्या वळवळीतूनही तुझ्या विराट हिरवळीचा विषवल्ली न झालेला एकही कोपरा. धादांतामधून स्वत:ला लोकांनी उलगडत न्यावा म्हणून सोपा विनाकारण न होणारा एक संध्याकाळचा अक्षर संकल्प ! एका वैवस्वत कोड्यातून सुटून मन्वंतराच्या प्रदीर्घ प्रवासातूनही न उकललेल्या गूढाची संजदिक संवेदना! विविध विषय शास्त्रांचे, धर्मांचे, पंथांचे, संतांचे, फकिरांचे, फादरचे, भणंग अतिथींचे आकलन करून बसावे आणि ओळींच्या सारीपाटावर आपलीच सोंगटी भिरकावून द्यावी, म्हणावे ग्रेस हाच तर नाही जगण्याचा धागा? तर साजणसंगाची कुजबूज हजारो जंगलांमधून कृष्णपावलांची धडकून प्राणांचे असे लचके तोडत राहते की थेंबही सांडत नाही पण बंबाळातून देह सुटत नाही. राजपुत्र असो वा डार्लिंग, केशव, साऊल, वेणू, वंदना, वीणा, मिथिला, राघव, माधवी, प्राची.. आणि सीता, अहिल्या, भामापासून द्रौपदी.. हिटलरपर्यंत सारे प्रेमळ हिंस्त्र ऐवज एकाच स्वप्ननायकाच्या वास्तव राहुटीत जळत जाळत असलेले. हजारो वाचकांच्या बुलंद इमारतींखालून वाहणारे हे चंद्रमाधवीचे प्रदेश मितव्यासोबत सांजभयात हलत राहतात.
ये बिजली राख कर देगी
तेरे प्यार की दुनिया
न फिर तू जी सकेगा
और न तुझको मौत आयेगी
ग्रेस,
पावसाचे विलक्षण ठिबककारुण्य तुझ्या अक्षराअक्षरात गच्च भरलेले तुला पावसाचे पालाण आणि मागर्धाच्या आठवणींनी तुझा चंद्रजीव गोळा गोळा होत असताना पाऊस आभाळातून सुटलेला तरीही येणारा प्रत्येक थेंब वेगळा, खास माझा, माझाच कारण हा पाऊस ग्रेसचा आहे असं म्हणणारा ग्रेसफुल, रेनडिअरच्या कवितेतला काठोकाठ पाऊस एक डोह. भीतीच्या अर्थाची अनंत वलये साकारणारा गूढ वाच्यार्थ म्हणूनच ग्रेस म्हणतो-
घन जमतिल तेव्हा जमतिल
मोकळे केस तू सोड !
घन जमतिल तेव्हा जमतिल
वार्‍याचे अलगुज खोटे
हे दु:ख मिठीचे तोवर
हाडांना घेऊन पेटे..
या पेटत्या दु:खाची झळाळी घेऊन मृगजळाचं बांधकाम तोच करतो तो संध्यामग्न पुरुष असतो आणि करुणार्त मातेची ओली भावगर्भ बिंदी कपाळावर गोंदून जो काळोखाचा कण न कण पिंजून रात्र सैरभैर विखरून टाकतो. हे अद्भूत फकिरपण ना कुणास इतके गच्च ठासलेले, परिपक्वतेने अर्थांना संमोहित करणारे. ग्रेसची सगळी पात्रे त्यांचे अवयव अवतीभवती वावरणारे आपल्या ! आपल्यात असूनही दूरस्थाच्या परकाया प्रकाशात सचैल न्हात गाणारे !
ग्रेस,
लौकिकार्थाने मित्र-मैत्रिणी सुहृद कुणी असोत नसोत तरीही तुम्ही त्यांचे जे नसतीलही तुमचे किंवा असतीलही तुमचे जे नव्हतेच तुमचे तुमच्यापाशी. क्षितिजाच्या अधांतराशी सावळा रंगखेळ करणारी दिव्यशक्ती धारण करणारा तळहातावर असा कोणता ध्रुवतारा अढळमित्र होता तुमचा? जी. ए. की अजून कोणी? खरंतर तुमचा आणि जीएंचा प्रवास न भेटीचा म्हणून कडकडून जीवाचे त्या जीवात घालणारा. तुमचा किशोर पाठक निमित्त

Wednesday, March 21, 2012

आमची कविता...

आमच्या कवितेत नसतात,
कुणबी, गावरान शब्द, गाणारे पक्षी, सरकारवर ताशेरे, सावकारांचे अत्याचार,
पावसाला घातलेले साकडे, माळरान, जळालेलं पीक आणि विश्रब्ध करणार्‍या आत्महत्या...
आमची कविता असते ’अबोली’ सारखी
’त्यात मातीचा गंध नसतो’...असं समिक्षक म्हणतात...
आमच्या कवितेवर होतो आरोप
’ही कविता भाषा समृद्ध करित नाही!’
पण आमची कविता आणि आयुष्य
समृद्धीपेक्षाही वृद्धीकडे जास्त झुकते.
आमच्या कवितांचे संग्रह निघत नाहित कारण
साहेब सुट्टी मंजूर करित नाही.
आम्ही छंदोबद्ध कविता फक्त रविवारीच लिहीतो कारण
त्या दिवशी फुरसत असते अलंकार आणि छंदात मनसोक्त डुंबायची
एरवी आठवडाभर फक्त गर्दी
रस्त्यात माणसांची आणि कवितेत शब्दांची.
आमची कविता जन्माला येते ’वेंटिलेटर’ लावून
कारण एसी ऑफिस मधे खिडक्या बंद असतात.
आमची कविता फुलासारखी नाही,
ना आमच्या कवितेने व्रत घेतलय समाजसेवेचं!
’जून्या भळभळणार्‍या वेदनेला कमी करायचे असेल तर,
त्याच जखमेच्या बाजूला दूसरी मोठी जखम करावी’
अशा हिडीस वृत्तीतून जन्म घेते आमची कविता...
आमच्या कवितेला भूतकाळ नाही आणि
वर्तमानात वाचली किंवा ऐकली जाते इतकच तिचं अस्तित्व...
जे पुरेसं असतं एक तरी ठोका चुकवायला...
पण केवळ
आम्ही काळ्या कागदावर शुभ्र कविता लिहीतो म्हणून
आमच्या कवितेचं अस्तित्व अमान्य करू नका!
-प्रथमेश किशोर पाठक

वामांगी

(अरूण कोलटकरांची आम्हाला सर्वाधिक आवडणारी कविता... शेवटपर्यंत वाचा... शेवटच्या एका ओळीत मुस्कटात मारतात!)

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट

मी म्हणालो -हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण

- अरूण कोलटकर

रडायचे कुठे कळेना...

 रडायचे कुठे कळेना
कुठे हे अश्रू वाहायचे
आसवांना प्रश्न पडतो
कसे लपून राहायचे...

त्रासलेली माणसे ही
कुशी कुठे शोधायची
मिठीत या अनोळखी
किती मी गुदमरायचे...

मंदिराच्या गर्भाकोशी
येई मनात शांतता
गोठले हे अश्रू सारे
ईश्वरा त्या पाहता...

सांग ना रडू कुठे मी
सांग पाघळू कसा
दाटलेली आसवे ही
पाझरा गिळू कसा...

दिसे अशी अजाणता
प्रेतयात्रा अनोळखी
टाहो होते शब्द तीत
वेदनाही बोडकी...

त्या धुराच्या झोंबण्याने
डोळे असे सुखावले
गोठलेले अश्रू सारे
खळाळूनी की वाहले...

टाहो मी ही फोडिले अन
वेदनाही फाडल्या
आप्त नव्हते बघुनी मग
अश्रुधारा झाडल्या...

मोकळा तो निघून गेला
मोकळा मी जाहलो
मोकळा आसमंत तेव्हा
मोकळ्याने पहिला...

रडायचे कुठे कळेना
कुठे हे अश्रू वाहायचे
आसवांना प्रश्न पडतो
कसे लपून राहायचे...

- अमेय घरत

Tuesday, March 20, 2012

जगण्यामध्ये ब्रम्हानंद


बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.

सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रम्हानंद.

-विंदा करंदीकर