Wednesday, June 4, 2014

कधी कधी

कधी कधी भेटयोग असाच जुळून येतो,
कधी कधी अचानक मोगरा फुलून येतो

विचारही नसतो आग्रहही नाही,
पेपरमधे तसे भविष्यही नाही,
कधी कधी मंगळही गालात हसून घेतो...

छोटी भेट, छोटे संवाद, छोटेसे हसू,
सांगणे अपुले इतुकेच ’एकमेकांसाठी असू’
कधी कधी कुणाचे असणे कणा ताठ करून जातो...

घट्ट मिठी मारली का? नक्की माहित नसते,
आजवर कधी साधी मिठी मारलेलीच नसते,
कधी कधी ठोकाही क्षणात खंडकाव्य लिहून जातो...

जसे भेटणे तसेच निघणे अचानकच असते,
वळून पहायचे किती? काही बंधनही नसते,
कधी कधी ’कधी कधी’ चे आभार मानत बसतो...

-प्रथमेश किशोर पाठक

मित्र ?


ज्या कळ्या आहेत सडल्या त्या कधी खुलणार का
मी पणा जागृत ज्यांचा मित्र ते होणार का

दाखवावा चंद्र त्यांना ते नखुर्डे पाहती
भग्न त्यांच्या अंतराळी कृत्तिका दिसणार का

जाणताती हेच ते ज्वालाग्रही व्हावे कसे
जाळती सहवास ज्यांचे ऊब ते देणार का

ना मिळे त्याच्या मनातील अक्षरांना श्वासही
जे स्वत: स्फुरलेच नाही कधी लिहीणार का

गीत त्यांचे ऐकता थरकाप होई घाबरा
आत्मकेंद्री सूर यांचे ते मना भिडणार का

-प्रथमेश किशोर पाठक

हतबल

इच्छामरणी भीष्म जसा की
हतबल सारे झाले,
मरायचिही इच्छा आहे
पार्थ कुणा ना मिळे

झोपायाची हौस तरिही
झोप नसे काहिंची,
स्वप्न पाहुनी जागे होती
हतबल स्वप्ने यांची

काळजातला शब्द कधी
ना तोडून गेला तुरूंग
नात्यांखाली पेरीत गेले
हतबलतेचा सुरुंग

गाणे होते कसे विषारी
कळते ’ते’ गातांना
श्रुती यांच्या हतबल सार्‍या
स्वरांमधे दडलेल्या

जगण्यावरचे इंद्रधनू
हे पडे जरा तोकडे,
हतबल आहे तरिही जगती
हेही नसे थोडके!

-प्रथमेश किशोर पाठक