Tuesday, March 3, 2015

पत्र लिही पण...

नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे,
लिपीरेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे.

चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून,
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून.

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन,
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण.

नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडीघडीतून,
नको पाठवू असे कितीकदा सांगितले मी, तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते,
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते.......
-
इंदिरा संत

समुद्र बिलोरी आईना

समुद्र बिलोरी आईना,
सृष्टीला पाचवा महिना,

वाकले माडांचे माथे
चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावित आली
कार्तिक नवमीची रैना

कटीस अंजिरी नेसू,
गालात मिश्‍कील हासू,
मयुरपंखी मधुरडंखी
उडाली गोरटी मैना

लावण्य जातसे ऊतू,
वायाच जातसे ऋतू
अशाच वेळी गेलिस का तू
करुन जीवाची दैना
-
बा. . बोरकर

गडद जांभळं भरलं आभाळ

गडद जांभळं
भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

मातीला दर्वळ
निर्मळ पाण्याला
झाडांच्या गाण्याला बाई मखमली झीळ

सांजेच्या मलूल
धुळवळ वेळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल

बिलोरी हातांना
मोराचं गोंदण
चांदण्याचं बन बाई पेटलं पाण्यानं
जांभळीच्या झाडाला गंऽ सांगावा शकून.
- ना धों महानोर

एका रिमझिम गावी

एका रिमझिम गावी
भरुन आहे हृदयस्त तान
पण स्वगत विसरून
तिथे जाता यायला पाहिजे

चालून जाता येण्यासारखी
पायतळी आहे माती
पण जाणं - न जाणं तरी
कुणाच्या हाती?
  -आरती प्रभु