Tuesday, January 17, 2012

अस्पृश्य

(कवी कायमच स्वत:ला आणि स्वत:च्या कवितेल्या निरनिराळ्या भुमिकेतून बघत असतो... हा कवी स्वत:ला ’घरात बाजूला बसलेल्या/ कावळा शिवलेल्या स्त्री’च्या भूमिकेत ठेवतोय... तिचा तो एकांत जर माझ्या कवितेला मिळाला तर माझी कविता कशी बहरेल...हे पडताळून बघतोय...)

जरी भासलो वाहत्या गर्दी सारखा तरी
माझ्याच तळघरात एकाकी मी
जशी प्रशस्त वाड्याच्या तळघरात तेवत बसलेली एखादी ती
जिला नुकताच कावळा शिवून गेलाय...

किंवा कधी पोटमाळ्याच्या अडगळीत
कौलातून झिरपणाऱ्या चंद्रधारा मोजत मोजत
बाजूला होऊन किती दिवस झालेत, हे मोजणारा मी...

कुणी फेटाळण्या आधीच, गर्दी पासून अलिप्त होत जात
त्या सर्वांच्या विरुद्ध्याच्या दिशेने चालत जात असताना
अचानक असं शांत वाटू लागतं
जशी गर्दी वाहून चालली आहे माझ्या भोवतालची...
आणि मी एकटाच कुठेतरी, स्वतःची जाणीव झाल्यागत
स्वतःचीच समाधी लावत, स्वतःच्याच सहवासात, स्वतःसाठी!

अचानक भान सोडून विचारतं मन स्वतःलाच कधी कधी
चार दिवस संपले नाहीत का अजून?
एकटाच चालत जातो आहेस अजून?

चल, पुन्हा एखादा प्रयत्न करून बघतो गर्दीतला होण्याचा...
मग सोडून समाधी वळतो पुन्हा, दिशा नसलेल्या गर्दीतून पुढे पुढे सरपटण्यासाठी...

चारच पावलं गेल्यावर पुन्हा जमतात ते कावळे
गर्दीवर घिरट्या घालत राहतात सारखे
जशी घरट्यात सोडलेल्या पिल्लावर नजर ठेवून घार
उंच आकाशात घिरट्या घालत राहते...

मी तर आतुरलेलाच असतो... अशुद्ध होण्यासाठी!
पुन्हा तळघर, पुन्हा काळोख, पुन्हा एकांत, पुन्हा समाधी!
मी तर आतुरलेलाच असतो... पुन्हा अस्पृश्य होण्यासाठी!

- अमेय घरत

Thursday, January 12, 2012

शब्दांकीत

( ही कवितेवरची कविता आहे... एक कवी खूप दिवस काही सुचत नाही म्हणून उद्विग्नावस्थेत समुद्रावर जातो, भरलेल्या आभाळाकडे आणि समुद्राकडे कवितेचा आक्रोश करतो आणि एक कविता घेऊन घरी जातो...)


समुद्राकाठी उभे राहून मोकळ्या आभाळाकडे बघितल्यावर आतून एक संताप होतो.
समोरचं आभाळ चिडवत असतं मला एखाद्या कोर्‍या कागदाप्रमाणे,
चिथवत असतं लिही काहीतरी .... पण मी शांत....
राग अनावर होतो आणि डोळ्यातून दोन थेंब गालावर घसरतात,
मी दोन्ही मुठीत धरतो आभाळ आणि चुरगळून टाकतो जमेल तेवढं...
डोळ्यातला राग पाण्याबरोबर बाहेर पडतो हळूहळू.....
चुरगळलेलं मूठीतलं आभाळ उघडून बघतो
तर त्यावर डोळ्यातले थेंब शब्दं बनून उभे असतात ओळी-ओळीत!
उधाणलेला समुद्र माझ्याकडे बघत असतो

जणू काही ती कविता मी त्याला ऐकवणारच आहे.
पण मी सोडून देतो आभाळाचा कागद हातातून
आणि पाणी शब्दांनी पुलकीत होतं.
माझ्या अंगावर एक लाट येवून त्याच शब्दांकीत पाण्यानी मला भिजवून जाते
आणि घेवून जाते मी लिहीलेली आभाळावरची कविता...
मी बघत बसतो दूर जाण्यार्‍या आभाळाकडे
भूकेला...
परत एकदा शब्दांसाठी आतूरलेला....
घरी पोहोचतो,
कपडे काढतो आणि सुगंध पसरतो
पुन्हा एकदा भिजलेल्या समुद्रातल्या अक्षरांचा..



-ऋतू