Tuesday, August 16, 2011

ग्रेस...

ग्रेस...

ग्रेस हा मराठीतील असा एक कवि आहे जो समजावून सांगणं महाकठीण काम... ग्रेस साठी प्रत्येक शब्द हा मोजून मापून वापरलेला असतो... तो स्वत:विषयी म्हणतो... "I am not a poet of an evening, i am a poet of a twilight" (मी संध्याकाळचा कवि नाही..मी सांजेचा कवि आहे)... त्याच्याच काही कवितांमधील काही ओळी...वाचलेल्या, ऐकलेल्या आणि उमजलेल्या... प्रत्येक कवितेच्या पेरिच्छेदानंतर त्याचं विश्लेषण दिलय (मला उमजलेलं)
१)
हले काचपत्रातली वेल साधी
निनादून घंटा तश्या वाकल्या,
खिळ्यांना दिसेना कुठे क्रुस न्यावा
प्रभुने अशा पापण्या झाकल्या... ग्रेस

(परमेश्वर हे प्रकाशाचे प्रतीक आहे. वास्तवात जगणार्‍या पापी आणि पुण्यवान माणसांना हाच प्रकाश मार्ग दाखवत असतो. ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळे ठोकून मारणार्‍या मारेकर्‍यांनाही नंतरच्या विल्हेवाटीसाठी प्रकाशाची गरज भासली. बाहेर पाऊस कोसळत होता. सभोवताली अंधार होता. आणि प्रभूनेच पापण्या झाकल्यामुळे, प्रभुच्या डोळ्यातील अखंड प्रकाश शांतपणे निजून गेला मारेकर्‍यांसाठी...)
२)
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता.
(ह्या ओळी "ती गेली तेव्हा रिमझिम पाउस..." या कवितेतील आहेत ज्या निवडुंग चित्रपटात घेतली नाहीये...तिचं हे विश्लेषण...
आपल्या आईच्या अस्तित्वाचे, तिच्या स्त्रित्वाचे विश्लेषण देताना कवीला तिचा पुत्र न् ती त्यांची आई या नात्यापलिकडे जाउन विचार करावा लागतो, म्हणजेच एक पुरुष, नर म्हणून त्यांना तिच्याकडे एक मादी म्हणून पाहावे लागते. वास्तविक आईची न् लेकराची ताटातूट हा काही आनंददायी क्षण नसतो, आपली आई ही तिच्या मातृत्व भावनेच्या पलिकडे तिच्या देहस्वी भावनेकडे ओढली जाते, ती लेकराला सोडून जाते हे तेव्हा तिच्या मार्गात येत नाही...ती कुठे तरी गेली आहे पण मरण पावलेली नाही, वास्तविक ही ताटातूट कवीला एवढी अगतिक करून जाते, की ती व्यक्त करताना रसिकांचा अस समज होतो की ती म्हणजे त्यांची आई कालाच्या पडदया आड़ गेलीय, मरण पावलीय. पण ती काही काळ दूर जाणे हे सुद्धा कवीने इतक्या उत्कट शब्दांत मांडले आहे, "ती गेली तेव्हा रिमझिम पाउस..."
पण ती जेव्हा परत येते, तिचे परतणे कवीला एक पूर्ण पुरुष म्हणून आत्मविश्वास देणारे आहे.
ज्या कृष्णाने मयसभेत द्रौपदीच्या लज्जा रक्षणासाठी वस्त्रांचे आंतरपाट सोडले, तो कृष्ण एक पूर्ण नर, द्रौपदीच्या म्हणजे एक पूर्ण मादिच्या वस्त्रात नागडा होता तसा मी ही आईच्या मायेच्या वस्त्रात नागडा होउन जातो...)

३)

कृष्णएकांत- २

तिच्या अंगणातील प्राजक्त बंदी तरी सत्यभामे ढळे तोल का ?
झाडाप्रमाणे असे झाड हेही असे सांगते ती ,तरी हुंदका ?


इथे बासरीच्या गडे आतड्याला हवा चंदनी लाकडाची नवी;
तुला रुक्मिणी का फुले वेचताना सुगंधात हि भेटते वाळवी

संहार आता करा यादवांचे जुनी राजधानी रिकामी करा ;
रथाला कुणी अश्व देऊ नका अन शिरच्छेद माझे कसे हि धरा


वैरण आयुष्य झाले तरीही फुलांना कुणी बोल देऊ नये;
मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या गवाक्षातला चंद्र झाकू नये

नको धाक घालू नको हाक तोलू इलाख्यातली गुप्त झाली नदी ;निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो खुनाच्या कटातूनहि गारदी.


जिथे कृष्णएकांत देठात प्राजक्त राधेस हा रंग येतो कसा ?सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा .

(सत्यभामा आणि रुक्मिणी ह्या कृष्णाच्या पत्नी. आपण रुक्मिणीपेक्षा उजवं असावं हे सत्यभामेला कायम वाटायच आणि म्हणून तिने कृष्णाने दिलेले पारिजातकाचे झाड आपल्या अंगणात लावले परंतू तिच्या मनात असलेल्या मत्सरापायी त्या झाडाची फुलं रूक्मिणीच्या अंगणात पडायची! ह्या कवितेतून निरनिराळ्या व्यक्तीमत्वांचं व्यक्तीचित्रण तर केलच आहे पण सगळ्यात शेवटी कृष्णाचं दू:ख हलकेच मांडलय..आणि तो दु:खाचा वसाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा एकांतवास आहे...)

No comments:

Post a Comment