Wednesday, March 21, 2012

आमची कविता...

आमच्या कवितेत नसतात,
कुणबी, गावरान शब्द, गाणारे पक्षी, सरकारवर ताशेरे, सावकारांचे अत्याचार,
पावसाला घातलेले साकडे, माळरान, जळालेलं पीक आणि विश्रब्ध करणार्‍या आत्महत्या...
आमची कविता असते ’अबोली’ सारखी
’त्यात मातीचा गंध नसतो’...असं समिक्षक म्हणतात...
आमच्या कवितेवर होतो आरोप
’ही कविता भाषा समृद्ध करित नाही!’
पण आमची कविता आणि आयुष्य
समृद्धीपेक्षाही वृद्धीकडे जास्त झुकते.
आमच्या कवितांचे संग्रह निघत नाहित कारण
साहेब सुट्टी मंजूर करित नाही.
आम्ही छंदोबद्ध कविता फक्त रविवारीच लिहीतो कारण
त्या दिवशी फुरसत असते अलंकार आणि छंदात मनसोक्त डुंबायची
एरवी आठवडाभर फक्त गर्दी
रस्त्यात माणसांची आणि कवितेत शब्दांची.
आमची कविता जन्माला येते ’वेंटिलेटर’ लावून
कारण एसी ऑफिस मधे खिडक्या बंद असतात.
आमची कविता फुलासारखी नाही,
ना आमच्या कवितेने व्रत घेतलय समाजसेवेचं!
’जून्या भळभळणार्‍या वेदनेला कमी करायचे असेल तर,
त्याच जखमेच्या बाजूला दूसरी मोठी जखम करावी’
अशा हिडीस वृत्तीतून जन्म घेते आमची कविता...
आमच्या कवितेला भूतकाळ नाही आणि
वर्तमानात वाचली किंवा ऐकली जाते इतकच तिचं अस्तित्व...
जे पुरेसं असतं एक तरी ठोका चुकवायला...
पण केवळ
आम्ही काळ्या कागदावर शुभ्र कविता लिहीतो म्हणून
आमच्या कवितेचं अस्तित्व अमान्य करू नका!
-प्रथमेश किशोर पाठक

5 comments: